आमदार देवतळेंचे पोलीस विभागाला पत्र
वरोरा : राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आनंदवन आणि रत्नमाला चौकात मोठी वर्दळ असते. मात्र त्या तुलनेत वाहतूक पोलिसांची संख्या फार कमी आहे. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक शिपायांची संख्या वाढवून नेमणूक करावी अशी मागणी आमदार करण देवतळे यांनी वरोरा पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्याकडे रविवार दि.१५ डिसेंबर रोजी निवेदनातून केली आहे.
. वरोरा शहर शैक्षणिक व औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. या शहरातून नागपूर-चंद्रपूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो. या मार्गाच्या दोन्ही बाजूला नागरी वस्ती आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयांचे जाळे पसरलेले आहे . यामुळे दिवसभर या दोन्ही चौकातून नागरिकांसह हजारो विद्यार्थ्यांची वर्दळ सुरू असते. श्रद्धेय बाबा आमटे यांच्या आनंदवनात राहणारे अंध, अपंग , कृष्टरोगी यांनाही सदर चौक ओलांडावा लागतो. या मार्गावरून भरधाव जड वाहतूक दिवसभर सुरू असते. अशा वाहना पासून आतापर्यंत अनेक अपघात झाले आहे. तेव्हा खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर – चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळीच्या अशा आनंदवन आणि रत्नमाला चौकात पुरेशा प्रमाणात वाहतूक शिपायाची नेमणूक करावी अशी मागणी आमदार करण देवतळे यांनी वरोरा पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.


