जन आंदोलन उभारण्याचा दत्तात्रय समर्थ व ॲड.रविन्द्र उमाठे यांचा इशारा
सिंदेवाही : चंद्रपुर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील शिवणी वनपरिक्षेत्र (प्रादेशिक) कार्यालयाचे रोखलेखा खर्च प्रमाणकेची तातडीने विशेष पथकाद्वारे चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिका-यांवर कारवाई करावी अशी मागणी सामान्य कामगार सेवाचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ व जिल्हा आयटकचे जेष्ठ नेते अधिवक्ता रविन्द्र उमाठे यांनी वरिष्ठांकडे केली असून तात्काळ चौकशी न झाल्यास जन आंदोलन उभारण्याचा इशारा सुद्धा अधिवक्ता रवींद्र उमाठे यांनी दिला आहे.
. शिवणी वनपरिक्षेत्र कार्यालय मार्फत सन २०१९ ते २२ या कालावधीत वनपरिक्षेत्रातील गवत, पालापाचोळा कापणे, व गोळा करून जाळणे, याकरिता लागणारे मजूर वासेरा येथील आधार सुशिक्षित बेरोजगार संस्थेकडून पुरवठा केले असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी माहिती अधिकारातून याबाबत माहिती मागितले असता संस्थेने कोणतेही मजूर पुरवठा केले असल्याचे संबधित कार्यालयात नोंद नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे मुरलीधर गायकवाड यांनी सदर कामात गैरव्यवहार झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. असे गृहीत धरून भ्रष्ट्राचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल करून सदर प्रकरणाची विशेष पथकाद्वारे चौकशी करण्याची मागणी नोव्हेंबर २०२३ मध्ये केली आहे.
. मात्र त्या प्रकरणाकडे कोणतेही लक्ष ना घालता संबधित तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे या संदर्भात सामान्य कामगार सेवाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या कडे लेखी स्वरूपात तक्रार नोंदवली होती. याच तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २९जानेवारी २०२४ ला उपरोक्त प्रकरणात नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी असे पत्र मुख्य वनसंरक्षक वनवृत्त चंद्रपूर यांना पाठविण्यात आले आहे. मात्र अद्याप या प्रकरणात निःपक्षपाती चौकशी झाली नसल्याचे समर्थ यांचे म्हणणे आहे. उपरोक्त प्रकरणी तातडीने चौकशी न झाल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा आयटकचे रविन्द्र उमाठे यांनी दिला आहे.
. समर्थ यांनी याच प्रकरणाच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे या पूर्वीच एक लेखी निवेदन सादर केले आहेत. सदरहु प्रकरणाची चौकशी झाल्यास सत्य उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे समर्थ यांनी म्हटले आहे. या अगोदर याच प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रार दाखल केली होती हे येथे विशेष उल्लेखनीय आहे. या प्रकरणात दत्तात्रय समर्थ हे सातत्याने पाठपुरावा करत आहे. महसूल आयुक्त नागपूर यांची आपण लवकरच नागपूर मुक्कामी भेट घेत त्यांना याच प्रकरणाच्या संदर्भात एक लेखी निवेदन सादर करणार असल्याचे त्यांनी आज भ्रमनध्वनीवरुन बोलताना दैनिक नवजीवन ला सांगितले. विशेष म्हणजे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या कडे या आधीच त्यांनी लेखी निवेदने सादर केली आहेत.


