वरोरा : वरोरा- भद्रावती विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून गावोगावी प्रचारात कार्यकर्ते व्यस्त आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात कापुस वेचनी, शेतातील काडीकचरा वेचणे व पेरणीसाठी शेतातील कामांसाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. मजूर वेळेवर मिळत नसल्याने बळीराजा समस्येच्या गर्तेत सापडला आहे.
. तालुक्यात खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. खरीपातील कापुस ,भात काढणीची कामे युध्दपातळीवर सुरू आहेत. तर रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, मका पेरणीची लगबग शेतशिवारामध्ये सुरू आहे. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शेतीकामासाठी मजूर वेळेवर मिळत नसल्याने शेतक-यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही तालुक्यातील विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. गाव कट्ट्यावर पानटपरीवर सर्वत्र फक्त निवडणुकीची चर्चा सुरू आहे.
. उमेदवारासह त्यांचे कार्यकर्ते देखील निवडणूक कामात व्यस्त आहेत. याचा परिणाम शेती व्यवसायावर पडत असल्याने शेतीकामांना मजूर मिळणे कठीण झाले आहे. संपुर्ण तालुक्यात विविध पक्षांच्या सभांचा धडाका गावोगावी सुरू झाला आहे. त्यामुळे प्रचारात नागरिक व्यस्त असले तरी शेतकरी मात्र समस्येच्या गर्तेत सापडला आहे. याचा परिणाम शेती कार्यावर झाला आहे. रब्बी हंगामातील लगबगीसाठी मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे. यावर्षी निवडणूक प्रचाराचा जोर वाढल्याने मजुरांची टंचाई प्रकर्षान जाणवू लागली आहे. मजूर नेत्यांच्या सभा, पदयात्रा, प्रचारात जास्त वेळ देत आहेत.


