दोषी अधिकार्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा !
पत्रकार परिषदेत कुटुंबाची मागणी
सिंदेवाही : वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा पत्र व्यवहार करूनही माझ्या घरावरून गेलेली ३३ केव्हीची लाईन हटवली नाही. त्यामुळे माझ्या मुलीचा मुलगा अद्विक विकेष रामटेके (६) राह. चंद्रपूर यांचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाला. याला जबाबदार वीजवितरण कंपनीचे अधिकारी आहेत. त्यांचेवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृतकाच्या आई वडिलास आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी नंदा भिमदेव लोखंडे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
. सिंदेवाही पंचशील नगर मधील माझे स्वतःच्या राहत्या घराच्या छतावर वीजवितरण कंपनीच्या ३३ केव्ही लाईन गेलेली आहे. त्याच्या तारा लोंबकळत असल्याने त्यापासून आमच्या कुटुंबीयांना कधीही धोका होऊ शकतो, त्यामुळे लोंबकळणाऱ्या तारांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी करीत मागील अनेक दिवसापासून वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना अर्ज सादर करण्यात आले आहेत. त्यासोबतच तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय वडेट्टीवार यांना सुद्धा विनंती अर्ज दिले. मात्र कोणत्याच अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. अखेर काळाने डाव साधत २९ डिसेंबर 2024 रोजी माझ्या मुलीचा मुलगा आद्विक विकेश रामटेके राह. चंद्रपूर या सहा वर्षीय निष्पाप बालकाचा विद्युत करंट मृत्यू झाला आहे.
. वीजवितरण कंपनीला अनेकदा पत्र देऊन घरावरील ३३ केव्हीच्या लाईन हटविण्याची मागणी केलेली आहे. मात्र वीजवितरण कंपनीचे अधिकारी यांनी आम्हालाच उलट उत्तरे देऊन तुम्हाला या ठिकाणी घराचे बांधकाम करण्यास कोण सांगितले आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी घराचे बांधकम करण्यात आले आहे. ती जागा ले आऊट मधील असून त्यातील एक प्लॉट घेऊन आम्ही घराचे बांधकाम केले आहे. असे असताना सुद्धा वीजवितरण कंपनी आम्हालाच उद्धट उत्तरे देऊन आमच्या मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. माझ्या मुलीचा मुलगा आमचेकडे वाढदिवस कार्यक्रमासाठी आला होता. अचानक तो सर्वांच्या नजर चुकवून पायऱ्यांवरून वरती गेला. आणि त्या ठिकाणाहून गेलेल्या ३३ केव्हिच्या ताराना हातात पकडले. आणि त्यातच तो पूर्णतः भाजल्या गेला. वीजवितरण कंपनीला अर्ज केल्यानंतर ती लाईन हटवली असती तर माझ्या नातवाचा मृत्यू झालाच नसता. त्यामुळे माझ्या नातवाच्या मृत्यूस वीजवितरण कंपनीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करून संबधित अधिकार्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आणि मृतकाच्या आई वडिलांना आर्थिक मदत करावी. अशी मागणी नंदा भिमदेव लोखंडे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.


