राज्य सरकारचा मोठा निर्णय
ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेमुळे सरपंचांना दिलासा
बल्लारपूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींना लाभ
बल्लारपूर : राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे, तिथे आता सरकारी अधिकाऱ्याऐवजी विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’ म्हणून कामकाज पाहणार आहेत. ग्रामविकास विभागाने २० फेब्रुवारी २०२६ रोजी यासंदर्भात अधिकृत राजपत्र (अधिसूचना) प्रसिद्ध केले असून, यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींना मोठा दिलासा मिळाला आहे.
. एकट्या बल्लारपूर तालुक्यातील १७ पैकी १२ ग्रामपंचायतींची मुदत नुकतीच संपली होती. यामध्ये विसापूर, नांदगाव (पोडे), हडस्ती, मानोरा, कळमना, पळसगाव, कोर्टीमक्ता, गिलबीली, आमडी आणि किन्ही (मुदत ४ फेब्रुवारी रोजी संपलेली), तसेच लावारी व दहेली (मुदत ६ ऑगस्ट २०२४ रोजी संपलेली) या गावांचा समावेश आहे.
समितीद्वारे चालणार कारभार
नवीन निर्णयानुसार, केवळ सरपंचच नव्हे तर त्यांच्या सोबतीला उपसरपंच आणि काही निवडक सदस्यांची एक ‘कामकाज समिती’ गठीत केली जाणार आहे. प्रशासकीय राजवट लागू करण्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली असतानाच, या निर्णयामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांना पुढील किमान सहा महिन्यांसाठी कारभार सांभाळण्याची संधी मिळाली आहे.
. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळेल आणि स्थानिक नेतृत्वाची पकड कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


