- 23 मार्चपासून घरून होता बेपत्ता
बल्लारपूर : शहरातील बालाजी वार्डातील एक तरुण 23 मार्च रोजी रात्री ९ वाजता घरातून बाहेर पडला. मात्र तो घरी परत आला नाही. नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु तो कोठेच आढळून आला नाही. अखेर कुटुंबियांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार बल्लारपूर पोलीस ठाण्यात २४ मार्च रोजी केली. अशातच २५ मार्च रोज सोमवारला धलीवंदनाच्या दिवशी बल्लारपूर – राजुरा मार्गांवरील वर्धा नदीच्या पुलाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. वर्धा नदी पात्रात उडी घेऊन जीवनयात्रा संपविण्याऱ्या तरुणाचे नाव मोहमद नदीम मोहमद नईम (१९) रा. बालाजी वार्ड, बल्लारपूर असे आहे.
. बल्लारपूर – राजुरा मार्गादरम्यान वर्धा नदीच्या पुलाजवळ फळे विक्रेत्यांची दुकाने आहे.त्यातील एका दुकानदाराला वर्धा नदीच्या पात्रात एकाचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला.त्याने याची माहिती बल्लारपूर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बेपत्ता असलेल्या तरुण मोहमद नदीम यांचे वडील मोहमद नईम यांना घटनास्थळी पाचारण केले. तेव्हा त्यांनी तो मृतदेह मोहमद नदीमचा असल्याचे सांगितले. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.
. मोहमद नदीमने वर्धा नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या का केली, याचा उलघडा पोलीस करत आहे. या घटनेचा अधिक तपास बल्लारपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक असिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनात पी.एस.आय. गोविंद चाटे व त्यांचे पथक करत आहे.