वर्धा नदीच्या पुराने शेतशिवार जलमय

42

ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

कापूस, सोयाबीन पिकाला जबर फटका

विसापूर : शेतकऱ्यांनी जीवाची बाजी लावून खरीप हंगामाची लागवड केली. शेतात कापूस, सोयाबीन, भाजीपाला व अन्य कडधान्य पिकांची लागवड केली.मात्र,अचानक वर्धा नदी शेतकऱ्यांवर कोपली. नदीला आलेल्या पुराने शेतशिवार जलमय झाले. यामुळे ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

.        बल्लारपूर तालुक्यातील खरीप हंगाम कोरडवाहू आहे. निसर्गाच्या जलचक्रावर शेती हंगाम अवलंबून आहे. विसापूर, नांदगाव (पोडे), चारवट, हडस्ती, बामणी (दुधोली), दहेली, लावारी, कळमना, आमडी, पळसगाव, कोठारी, काटवली (बामणी) आदी गावातील शेतशिवार वर्धा नदीच्या तिरालगत आहे. मात्र, रविवारी वर्धा नदीचा जलस्तर अचानक वाढला. पुर परिस्थिती निर्माण झाली. वर्धा नदीच्या पुराने शेतकऱ्यांच्या हातात येणारे पिक पाण्याखाली आले. यामुळे कापूस, सोयाबीन, भाजीपाला, भात व कडधान्य पिकांची नासाडी झाली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडासी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

.        शेतकऱ्यांच्या सर्वात मोठा सण पोळा आहे. पोळ्याच्या सणाचा आनंद साजरा करण्याऐवजी पुराने दैना केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहे.निसर्गाचा जबर फटका बळीराज्याला बसला आहे. वर्धा नदीचा पूर मानव निर्मीत संकटाला चालना देणारा आहे. शासनाने तात्काळ शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी, असी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

” रविवारी अचानक वर्धा नदीला पूर आला. याला कारणीभूत शासकीय यंत्रणेचा गलथानपणा आहे. अपर वर्धा नदीवरील धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. परिणामी वर्धा नदीचा जलस्तर वाढला. पूर परिस्थिती निर्माण झाली. यामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या शेत पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी.                                                                                                                                               रामभाऊ टोंगे,                                                 माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, चंद्रपूर. “