घरावरील छत उडाले
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधाकर रोहनकर यांची भेट
भद्रावती : तालुक्यातील किन्हाळा गावात अवकाळी वादळ वाऱ्याने अनेकांच्या घरांची टिनाची छतं, कवेलू उडून गेली आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या धान्य व घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विजेचे खांब कोसळून घरांना धोका निर्माण झाला आहे.
. किन्हाळा गावासोबतच कोकेवाडा, सोनेगाव तुकूम, आष्टा परिसरात या वादळाचा प्रभाव झाला आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधाकर रोहनकर यांनीतात्काळ किन्हाळा गावाला भेट देत संबंधित अधिकाऱ्यांना अवगत करून दिले आहे. प्रशासनाने तातडीने पाहणी करून पोल दुरुस्तीचे काम सुरू केले. विजेचा पुरवठा संध्याकाळपर्यंत सुरळीत होईल, असे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता शाहू यांनी आश्वासन देण्यात आले आहे. भद्रावती पंचायत समिती संवर्ग अधिकारी आशितोष सपकाळ यांनी टीम पाठवून पंचनामा करण्याचे आश्वासन दिले.
. तहसीलदार भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल सेवक बुरचुंडे व तलाठी सलोटे यांनी गावातील नुकसानीचा पंचनामा केला. या आपत्तीमुळे जीवितहानी झाली नसली तरी घरदार व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पीडितांना मदत करण्याच्या प्रयत्नांसाठी पाठपुरावा केला जात आहे.
. ग्रामपंचायत सदस्य बालू मंगाम, गावातील पोलीस पाटील मुंढरे, विजय चौधरी यांनी तालुकाध्यक्ष सुधाकर रोहनकर यांच्यासोबत गावातील प्रत्येक घराची पाहणी करून गावकऱ्यांची विचारपूस केली. हे गाव ताडोबा लगत असून भद्रावती तालुक्यातील शेवटचे टोक समजले जाते. त्यामुळे विकासापासून बरेच वंचित असल्याने शासनाचे लक्ष अजून पर्यंत या गावाकडे वळले नाही. अशी संवेदना गावकऱ्यांनी व्यक्त केली.


