खासदार प्रतिभा धानोरकर यांचा केंद्र सरकारला इशारा
कोळसा व पोलाद विषयक स्थायी समितीच्या बैठकीत मांडली ठाम भूमिका
‘भारत-उझबेकिस्तान संसदीय मैत्री गटा’वर निवड
चंद्रपूर : “देशाचे पोलाद उत्पादनाचे लक्ष्य गाठताना स्थानिक पर्यावरणाचा आणि नागरिकांच्या आरोग्याचा बळी दिला जाऊ नये. कोळसा धुलाई केंद्रांची (वॉशरी) कार्यक्षमता तातडीने सुधारून प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे ही काळाची गरज आहे,” अशी ठाम भूमिका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मांडली. नवी दिल्ली येथील संसदीय सौध विस्तार भवन येथे आयोजित कोळसा, खाण व पोलाद विषयक स्थायी समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
. या बैठकीत खासदार धानोरकर यांनी कोकिंग कोल वॉशिंग क्षमतेचा केवळ ५०% वापर होत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. २०३० पर्यंत ३०० MTPA पोलाद उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यासाठी ४८ MT ‘वॉशड कोल’ची आवश्यकता असताना, भोजूडीह वॉशरी सारख्या प्रकल्पांना होणारा विलंब विकासाला खीळ घालत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या विलंबासाठी जबाबदार कंत्राटदारांवर काय कारवाई केली, असा सवाल त्यांनी मंत्रालयाला विचारला.
. कोळसा धुलाई प्रक्रियेमुळे हवेत पसरणारे धुलिकण आणि त्याचा शेतीवर होणारा विपरीत परिणाम रोखण्यासाठी ‘कोल इंडिया’ने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी लावून धरली.
. याच बैठकीदरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर यांची १८व्या लोकसभेसाठी ‘भारत-उझबेकिस्तान संसदीय मैत्री गटाच्या’ सदस्य म्हणून निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.


