नेरी : 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांना पीक कर्ज संमतीपत्रासाठी तसेच विविध कामाकरीता मुद्रांक (स्टॅम्प पेपर) ची गरज असते त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात स्टॅम्प पेपर खरेदी साठी स्टॅम्प विक्रेत्याकडे एकच गर्दी करीत आहेत.
. पीक कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर बंधनकारक केले आहे. शेतकरी चिमूर येथे स्टॅम्प खरेदी करण्यासाठी येत आहे. मात्र मुद्रांक विक्रेत्यांकडे 500 रुपयांचे स्टॅम्प उपलब्ध नसल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून स्टॅम्प खरेदी करिता विक्रेत्यांकडे शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पहावयास मिळत आहे.
. चिमूर तालुक्यात फक्त चिमूर येथे निवडक 3 ते 4 स्टॅम्प पेपर विक्रेते आहे. कुणाकडेही 500 रुपयांचे मुद्रांक (स्टॅम्प) उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना 100 रुपयांचे 5 स्टॅम्प पेपर घ्यावे लागत आहे. त्यातही स्टँप पेपर चे तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना दिवसभर ताटकळत रांगेत उभे राहावे लागत आहे. अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे
यामुळे शासनाने स्टॅम्प पेपर च्या तुटवड्याकडे लक्ष देऊन तत्काळ जास्तीत जास्त स्टॅम्प पेपर उपलब्ध करावे अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.


