शेतकऱ्यांचा सातबारा होणार का कोरा ?
महायुती ने जाहीरनाम्यात दिले होते आश्वासन
नेरी : महाराष्ट्र राज्यात विधानसभेची रणधुमाळी उडाली आणि महायुतीने भरघोष यश संपादन करीत सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री निवड केली. मंत्रिमंडळचा विस्तार केला. मात्र निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची विसर या सरकारला पडला असून सरकार बसल्यावर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते. तसेच मोठ्यानी या घोषणेचा उल्लेख अनेक जाहीर सभेत केला. परंतु सरकार स्थापन होऊनही मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होऊनही नागपूरला विशेष अधिवेशन सुद्धा झाले. मात्र महायुतीचे प्रस्थापित सरकार या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलायला सुद्धा तयार नसल्याचे चित्र बघावयास मिळत असून मुख्यमंत्री तसेच अनेक मंत्री यावर ब्र सुद्धा काढताना दिसत नाही. त्यामुळे कर्जमाफीची योजना हवेत विरते की काय ? अशी शंका शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे. असे शेतकरी संघटनेचे नेरी विभागाचे नेते अध्यक्ष काशिनाथ चांदेकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना केले आहे.
. निवडणुका आल्या की राजकारणी लोक आपापली पोळी शेकण्यासाठी अनेक आश्वासन देतात मात्र सत्तेत आल्यावर सर्व आश्वासने विसरून जातात असे चित्र या महायुती सरकारच्या काळात दिसत आहे. कारण निवडणुकी पूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येईल असे महायुतीच्या जाहीरनाम्यात सांगण्यात आले होते. त्यामुळे शेतकरी राज्यांनी महायुतीला भरघोष मतदान करीत निवडून दिले. त्यामुळे महायुतीने सरकार स्थापले परंतु कर्जमाफीच्या मुद्यावर कोणीही बोलताना दिसत नसल्याने तसेच नागपूर येथील विशेष अधिवेशनात सदर मुद्दा किंवा कर्जमाफीची घोषणा यावर चर्चा सुद्धा केली नसल्याने शेतकऱ्याच्या तोंडावर पाने पुसली गेली की काय ? असा आरोप शेतकरी नेते काशिनाथ चांदेकर यांनी केला आहे. तेव्हा सरकारने या शेतकरी राजाच्या कर्जमाफीच्या मुद्यावर लक्ष घालून तात्काळ कारवाई करून कर्जमाफी घोषित करून अंमलबजावणी करावी अन्यथा विसर पडलेल्या या सरकारला जागृत करण्यासाठी आंदोलने करून रस्त्यावर उतरून जाब विचारावे लागेल असा इशारा शेतकरी नेते काशिनाथ चांदेकर यांनी दिला आहे.


