वरोरा : भारत क्षयरोग मुक्त व्हावा यासाठी शासन तत्पर आहेच परंतु ही जबाबदारी प्रत्येकाने पार पाडावी व क्षयरोग मुक्त भारताची सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यापासून करावी, असे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी क्षयरोग मुक्त भारत जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले
. जनसेवेच्या कार्यातून क्षयरोग मुक्त भारत व्हावा यासाठी शनिवार दि. 07 डिसेंबर रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर खासदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या कुठलाही आजार हा वेळीच उपाय केल्यास बरा होऊ शकतो त्यासाठी आरोग्य विभाग सतत आपल्या सेवेत कार्यरत असते. त्यांच्या माध्यमातून क्षयरोग मुक्त भारताचा हा कार्यक्रम आपण यशस्वी करु, असे देखील मत यावेळी खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले. यावेळी मंचावर उपविभागीय अधिकारी झेथचंद्र, जिल्हा आरोग्य अधिकारी कटारे, जिल्हा शल्य चिकीत्सक चिंचोळे यासोबत आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरीकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


