➡️ शेतीला आले तलावाचे स्वरूप
➡️ सिंदेवाहीला जोडणारे अनेक मार्ग झाले बंद
सिंदेवाही : मागील आठवड्यापर्यंत पावसाने सिंदेवाही तालुक्यात पाठ फिरवली असल्याने शेतकऱ्यांनी पावसाकडे डोळे वटारले होते. मात्र मागील दोन दिवसाच्या पावसाने सिंदेवाही तालुक्यात कहर केला असून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीला तलावाचे स्वरूप आले असून तालुक्याला जोडणारे अनेक मार्ग बंद झाले आहेत.
. सिंदेवाही तालुक्यात मुख्यत्वे धानाचे १०० टक्के पीक घेतले जाते. या तालुक्यात अनेक तलाव, बोडया, असून यावर अवलंबून बरेच शेतकरी आपल्या शेतीचे सिंचन करीत असतात. जुलै महिना अर्धा अधिक संपला असताना पावसाने या तालुक्याकडे पाठ फिरविली होती. मात्र अचानक मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून तालुक्यातील सर्व तलाव, बोड्या, लघु प्रकल्प, १०० टक्के भरले असून ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. दोन दिवसाच्या पावसाने उमा नदी, बोकडडोह नदीला पूर आला आहे. तर अनेक शेतकऱ्यांच्या शेताला तलावाचे स्वरूप आले असून यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. सिंदेवाही या तालुक्याच्या ठिकाणाला जोडणारे वासेरा – गडबोरी मार्ग, देलनवाडी – पळसगाव मार्ग, यासह अनेक मार्ग बंद झाले आहेत. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने तालुका प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.


