◾आधार सुशिक्षित बेरोजगार संस्थेच्या खात्यात केले लाखो रुपये जमा
◾ गायकवाड यांची पत्रकार परिषदेतून मागणी
सिंदेवाही :- मागील अनेक वर्षापासून वनविभागात मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले असल्याच्या बातम्या ऐकल्या आहेत. मात्र सिंदेवाही तालुक्यातील शिवणी वनपरिक्षेत्रातील तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी बी.के. तुपे यांचे कार्यकाळात कोट्यवधीचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करून या घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाही करण्याची मागणी शिवणी येथील सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.
. सन २०२०- २१ या आर्थिक वर्षात शिवनी वनपरिक्षेत्रात गवत, पाचोळा कापणे, झुडूप कापणे व तो गोळा करून, त्याचा जाळण्यासाठी उपयोग करण्याकरिता त्या कामाचे कंत्राट वासेरा येथील आधार सुशिक्षित बेरोजगार संस्था यांना दिले असल्याची कागदोपत्री माहिती समोर आली आहे. यासाठी आधार सुशिक्षीत बेरोजगार या संस्थेच्या खात्यात जवळपास ७ लाखांपेक्षा जास्त रक्कम त्यांच्या बैंक ऑफ महाराष्ट्र वासेरा येथील बैंक खात्यात जमा केल्याची माहिती सुद्धा पुढे आली आहे. यासाठी आधार सुशिक्षित बेरोजगार संस्थेने विभागाला मजूर पुरविले असल्याचे कारण दाखविण्यात आले असले तरी सन २०२०-२१ च्या रोखलेखा दस्तऐवज वरुन प्रत्यक्षात आधार सुशिक्षित बेरोजगार या संस्थेने पुरविलेल्या मजुरांची नोंद शिवनी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या नोंदवहीत कुठेच आढळली नाही. तसेच त्यांचे मोजमाप आणि अभिलेख उपलब्ध नसल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
. जी कामे केली आहेत. त्यांचे मोजमाप पुस्तिका नाही, त्यांची अधिक्रुत नोंद नाही, व त्यांचे मूल्यांकन सुद्धा नाही. तर कोणत्या कारणाने त्या आधार संस्थेच्या बैंक खात्यात वन विभागाने लाखो रुपये जमा केले ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी बी.के. तुपे यांनी कर्तव्यात असताना संबंध नसलेल्या बाहेरच्या आधार संस्थेच्या खात्यात लाखो रुपये जमा का केले ? वासेरा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितिच्या बँक खात्यात करोडो रुपये जमा केले आहेत. मात्र ते करोडो रुपये कोणत्या कामावर खर्च करण्यात आले ? याचा काहीच लेखाजोगा कार्यालयात उपलब्ध नाही. त्यामुळे शिवणी वनपरिक्षेत्रात कोट्यवधीचा घोटाळा झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. असा आरोप करून याबाबत सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी ३० नोव्हेंबर २०२३ रोजी भ्रष्ट्राचार निर्मूलन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांचेकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच तक्रारीचे स्मरणपत्र जिल्हाधिकारी, तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, यांना दिले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे. तसेच सामान्य कामगार सेवा या संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना सुद्धा तक्रार दिली असून सदर घोटाळ्याची एसआयटी मार्फत त्वरित चौकशी करून दोषींवर कठोर कारवाही करण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.


