“व्याघ्रभूमीत आता ऑलिम्पिक खेळाडूही घडतील”

36

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास : ६७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

चंद्रपूर

. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू केलेल्या ‘मिशन ऑलिम्पिक २०३६’ची सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर क्रीडांगण येथून झाली आहे. २०३६ मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याचे व सर्वाधिक पदके जिंकण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र आघाडीवर असेल. चंद्रपूरच्या व्याघ्रभूमीत आता ऑलिम्पिक खेळाडूही घडतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

. ‘मिशन ऑलिम्पिक २०३६’ हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात आयोजित ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री मुनगंटीवार, आ. रामदास आंबटकर, द्रोणाचार्य-अर्जुन व पद्मश्री पुरस्कारप्राप्त बहादूरसिंग चव्हाण, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती हिमा दास, राष्ट्रीय खेळाडू ललिता बाबर, मालविका बन्सोड आणि व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

. जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने आणि दिप व मशाल प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ऑलिम्पिक खेळाडू मनजीत सिंग याने मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मशाल सुपूर्द केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सर्व पाहुण्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर मुख्य साेहळ्याला सुरुवात झाली. ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत १५५१ खेळाडू सहभागी झाले आहेत. यावेळी राष्ट्रीय खेळाडू संदीप गौण यांनी सर्व खेळाडूंना शपथ दिली. मिशन ऑलिम्पिक २०३६ बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले.

. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, पालकमंत्री मुनगंटीवार यांनी देशभरातील खेळाडू येथे एकत्र आणण्याची किमया केली, यासाठी त्यांचे अभिनंदन. चंद्रपूर वाघ आणि सागवानची भूमी. या भूमीतून आता ऑलिम्पिकचे खेळाडूही घडतील. लंडन येथील संग्रहालयातून शिवाजी महाराज यांची वाघनखं मुनगंटीवार आणत आहेत,याबद्दल त्यांचे अभिनंदन ही स्पर्धा यशस्वी होईल व ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे खेळाडू या स्पर्धेतून तयार होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. विसापूरच्या क्रीडांगणातून ‘मिशन ऑलिम्पिक’ला सुरुवात होत आहे, याचा आनंद आहे, अशी भावना पालकमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. क्रीडामंत्री बनसोडे यांनी या स्पर्धेसाठी मुनगंटीवार यांनी केलेले प्रयत्न आणि नियोजनाची सविस्तर माहिती दिली.

खेळाडूंना पाठिंबा द्या – हिमा दास : मुंबईहून एक हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या बल्लारपुरात ६७ वी राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा होत आहे. ‘ऑलिम्पिक २०३६’साठी खेळाडू घडविण्यास आतापासूनच सुरुवात करावी लागेल. त्यासाठी खेळाडूंना सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन हिमा दास हिने यावेळी केले.

ढोल-ताशांच्या गजरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत : क्रीडांगणावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. क्रीडांगण भव्य रोषणाई, रंगरंगोटीने सजविण्यात आले. विविध चौकांचे सौंदर्यीकरण, रंगबेरंगी चित्रांनी भिंती सजल्या होत्या.

शाल्मली खोलगडेच्या ‘लाइव्ह’ परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मने जिंकली : मुख्य उद्घाटन सोहळ्यानंतर प्रसिद्ध सिनेगायिका शाल्मली खोलगडे हिचा लाईव्ह संगीत परफॉर्मन्स झाला. यावेळी तिने मराठी व हिंदी चित्रपटांची गाणी गावून उपस्थित खेळाडूंसह प्रेक्षकांची मने जिंकली. यासोबतच फायर शो, लेझर शो, अक्रोबाईट डान्स आणि ढोल ताशांचा गजराने उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढविली.