केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेत खासदार धानोरकरांनी केली मागणी
विविध विषयांवर सकारात्मक चर्चा
चंद्रपूर : सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून खासदार प्रतिभा धानोरकर ह्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील विविध विकासात्मक कामासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा क्षेत्रातील रेल्वे सुविधा संबंधी त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील रेल्वे सुविधांना बळकटी देण्याची मागणी केली आहे.
. खासदार प्रतिभा धानोरकर ह्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक विभागाच्या विकासांत्मक कार्यासाठी अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. दि. 10 फेब्रूवारी रोजी त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत विविध मागण्यांसदर्भात चर्चा केली. या मध्ये त्यांनी प्रामुख्याने बल्लारपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस पर्यंत चालणारी गाडी आठवड्यातील संपुर्ण दिवस चालविण्याची विनंती केली. तसेच काजीपेठ-पुणे हि गाडी आठवड्यातून तीन दिवस चालविण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच, चंद्रपूर-पुणे व चंद्रपूर-मुंबई या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालविण्याची विनंती देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांची केली. त्यासोबतच चंद्रपूर हे औद्योगीक शहर असून येथे अनेक गाड्यांचा थांबा नसल्याने या ठिकाणी प्रत्येक गाडीचा थांबा देण्याची देखील विनंती खासदार धानोरकर यांनी केली. त्यासोबतच वरोरा व भद्रावती येथे कोरोना काळाच्या आधी थांबत असलेल्या सर्व गाड्यांचा थांबा पुर्ववत देण्याची मागणी केली. तसेच, मुंबई-नंदीग्राम एक्सप्रेस ला मुकूटबन व लिंगती रेल्वे स्टेशन वर थांबा देण्यासोबतच मुकुटबन रेल्वे स्टेशन वर रेल्वे आरक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची विनंती देखील खासदार धानोरकर यांनी केली. तसेच, झरी तालुक्यातील अहेरअल्ली या गावाजवळ असणाऱ्या अंडरपासची दुरुस्ती देखील करण्याची मागणी या दरम्यान केली. तसेच विसापूर येथील रेल्वे लाईन वर असणाऱ्या अंडरपास मध्ये लाईटस् ची व्यवस्था करण्याची मागणी करुन बल्लारपूर रेल्वे स्टेशन वर नागरीकांच्या सुविधेसाठी सुरु करण्यात आलेल्या बॅटरीचलीत कार पुन्हा सुरु करण्याची मागणी यावेळी खासदार धानोरकर यांनी केली. या सर्व मागण्यांवर केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी सकारात्मकता दर्शवून लवकरच या संदर्भाने निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांना दिले.


