Home सामाजिक तालुका पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

तालुका पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

1130

नागभीड : नागभीड तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील विद्यालयांमधून दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अवार्ड संस्था नागभीडच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

.      या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन जयस्वाल हे होते. तर, प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. अमीर धमानी, सॉयकॉलाजिस्ट डॉ. बी. शशिकांत व प्राचार्य हरिभाऊ गरफडे यांची उपस्थिती होती.

.    मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेपुढे दीप प्रज्वलन व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सोहळ्याची सुरुवात झाली.

.   कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून पत्रकार संघाचे अध्यक्ष ॲड. श्याम पाथोडे यांनी पत्रकार संघाच्या वाटचालीवर व कार्यक्रमाच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. पत्रकार संघाचे सचिव गुणवंत वैद्य यांनी अतिथींचा परिचय करून दिला. याप्रसंगी बोलताना प्रमुख अतिथी गरफडे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर, वेळेचे नियोजन करा, आईवडील कसेही असले तरी त्यांच्या आज्ञेचे पालन करा, मोबाईलचा जपून व ज्ञान मिळवण्यासाठी वापर करा, कोणत्या मार्गाने जायचे ते निश्चित करा आणि त्या दिशेने प्रयत्न करा अशा टिप्स दिल्या. डॉ. बी. शशिकांत म्हणाले, जीवनात यशस्वी होण्यासाठी जी गोष्ट आपल्याला पटलेली असेल ती अमलात आणा. विचार माणसाला घडवतो म्हणून विचार जपा आणि मी जो विचार करतो तो माझ्यासाठी फायद्याचा आहे का हे लक्षात घ्या.

.     प्राचार्य डॉ. अमीर धमानी यांनी, अमिताभ बच्चन व सचिन तेंडुलकर यांचे उदाहरण देत जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर, प्लॅनिंग महत्त्वाचे आहे. इतरांनी मिळवलेल्या गुणांची स्पर्धा करण्यापेक्षा आपल्यामध्ये काय दडले आहे हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न करा, आपल्यामधील नाविन्यपूर्ण गोष्ट कोणती आहे हे हेरून त्याचा यशस्वीपणे वापर करा हा मौलिक संदेश विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजन जयस्वाल यांचेही समयोचित भाषण झाले.

.     मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले त्यात दहावीच्या परीक्षेतील कुमुद कुर्झेकार, शर्वरी भोयर, अर्थ दुपारे, आदिती कामडी, सुरक्षा खंडाळे, श्वेता कायरकर, प्राजक्ता बोरकुटे, आरती सयाम, वैष्णवी बोरकर, लिनता पाथोडे, स्मिता शेंडे, वैष्णवी देशमुख, श्रृती चौधरी, मानसी गावंडे, नेहा समर्थ, खुशाली सुकारे, सुषमा राऊत, प्रज्वल नखाते व आदित्य आंबोरकर, तथा बारावीच्या परीक्षेतील कुणाल निमजे, गुंजन बोरकर, राजस वंजारी, वैभव चौधरी, आचल रोहणकर, प्रणय सावसाकडे, राज जेंगठे, मयुरी शामकुळे, अनुष्का डोर्लीकर, भुषण पानसे, प्रांजली बोरकर, कार्तिक मेंढुलकर, नेहा दडमल, प्राची तरारे, सृष्टी कामडी, नियती वाकडे, केतन इंदोरकर, अभय रोडगे, व नेहा नारमलवार या गुणवंतांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मनोहर मेश्राम व आभारप्रदर्शन कोषाध्यक्ष यशवंत निकुरे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Content is protected !!