गोंडवाना विद्यापीठात पार पडला दीक्षांत समारंभ
९६ संशोधकांना मिळाली आचार्य पदवी
बल्लारपूर : प्रतिकूल परिस्थितीतून तिने शिक्षणाचा ध्यास घेतला. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी काही ठिकाणी नोकरी केली. मात्र शिक्षणात खंड पडू दिला नाही. लग्नानंतर देखील पुढे शिक्षण थांबवले नाही. यामुळे सामाजिक कार्यातील संशोधनासाठी तिला पी. एच. डी. (आचार्य) पदवीने गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील दीक्षांत समारंभ सन्मानित करण्यात आले. विसापूर येथील विद्या महादेव पाल हिच्या कौतुकास्पद कामगिरीचा गौरव सोहळा प्रेरणा देणारा ठरला आहे.
. गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाचा तेरावा दीक्षांत समारंभ बुधवार (दि. २१) रोजी विद्यापीठाच्या सांस्कृतिक सभागृहात पार पडला. या सोहळ्यात तब्बल ९६ संशोधकांना ‘आचार्य’ पदवीने सन्मानित करण्यात आले. यामध्ये विसापूर येथील विद्या पाल हिला सामाजिक कार्य संशोधन केल्या बद्दल सन्मानित करण्यात आले. दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरखण, तंत्रशिक्षण विभागीय सहसंचालक डॉ. मनोज डायगव्हाणे, प्रसिद्ध समाज सेवक डॉ. अभय बंग व विविध विद्या शाखांचे अधिष्ठातांची उपस्थिती होती.
. विद्या पाल हिने सामाजिक कार्याचा विस्तृत अभ्यास डॉ. संजीव निंबाळकर यांच्या मार्गदर्शनात गोंडवाना विद्यापीठात संशोधन सादर केले. तिच्या पुस्तकी ज्ञानापेक्षा समाजाला फायदा होणाऱ्या सामाजिक कार्याच्या संशोधनाची दखल घेऊन आचार्य पदवी बहाल करण्यात आली. तिने आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक संजीव निंबाळकर, पती प्रशांत गजभीये,आईवडिल यांना दिले आहे. विसापूर येथे संशोधन करून पी.एच.डी.पदवी मिळवणारी विद्या पाल ही पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. तिच्या घवघवीत यशांचे गावकऱ्यांनी कौतुक केले.


