भद्रावती येथील फेरीलँड शाळेत ‘वार्षिकोत्सव‘ उत्साहात संपन्न
चिमुकल्यांच्या कलाविष्काराने जिंकली प्रेक्षकांची मने
भद्रावती : नेहमीच्या अभ्यासाव्यतिरिक्त प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये विविध कलागुण दडलेले असतात. या सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत महत्त्वाचे असते. या व्यासपीठामुळेच विद्यार्थी भविष्यात विविध क्षेत्रांत आपले नाव उज्ज्वल करू शकतात, असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख ॲड. युवराज धानोरकर यांनी केले. शहरातील फेरीलँड शाळेच्या वतीने आयोजित वार्षिकोत्सवात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
. या सोहळ्याच्या व्यासपीठावर नगराध्यक्ष प्रफुल चटकी, उपाध्यक्ष सुधीर सातपुते, संस्थेच्या उपाध्यक्ष सुशीला कौरासे, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम कौरासे, सचिव मिलिंद जिवणे, सदस्य निरूपा जिवणे, अमोल पाटील, प्राचार्या वर्षा जिवणे, आणि प्रज्ञा ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात करण्यात आली.
. वार्षिकोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम. यात एकल नृत्य, सामूहिक नृत्य, सुश्राव्य गीते आणि सामाजिक संदेश देणाऱ्या नाटिकांचा समावेश होता. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस कलाकृतींनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यानंतर सर्व विजेत्या आणि सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या वर्षा जिवणे यांनी केले, तर संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थ्यांनीच कौशल्याने हाताळले. शेवटी कुमुद पोईनकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


