वरोरा : आत्मविस्मृत झालेल्या समाजात चेतना फुंकण्यापासून ते आत्मभान जागृत झालेला हिंदू समाज हा शंभर वर्षाच्या अथक संघ साधनेचा परिणाम असल्याचे प्रतिपादन भारतीय विचार मंचे विदर्भ प्रांत संयोजक डॉ. सतपाल सोवळे यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरोडा नगर शाखेच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते.
. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून येथील गोसेविका मिरल भुतडा, तालुका संघचालक सुनील सरोदे, नगर संघचालक मनोज रेलकर विराजमान होते.
. काल, परिस्थिती नुसार देशाचे व्यावहारिक दर्शन घडवणारा संघ विचार व्यक्ती निर्माण ते राष्ट्र निर्माण हा टप्पा गाठण्यासाठी नित्य कटिबद्ध असून पंच परिवर्तनासाठी स्वयंसेवकांनी सिद्ध रहावे असे आवाहन सतपाल सोवळे यांनी याप्रसंगी केले. वरोरा येथील कर्मवीर कर्मवीर विद्यालयाच्या प्रांगणात ५ ऑक्टोबरला संध्याकाळी ६ वाजता हा विजयादशमी उत्सव कार्यक्रम संपन्न झाला.
. तत्पूर्वी ४ वाजता शहरातून गणवेशधारी स्वयंसेवकांचे भव्य पथसंचलन काढण्यात आले. करुणा आणि सेवा हा सर्वश्रेष्ठ धर्म असून गोमाता ही संपूर्ण जीवनाचा आधार असल्याचे मत प्रमुख अतिथी मिरल भुतडा यांनी यावेळी व्यक्त करत हिंदू एकजूट राहिला तरच समाज, संस्कृती आणि राष्ट्राची प्रगती व सुरक्षा कायम राहील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
. याप्रसंगी स्वयसेवकांनी सामूहिक समता, दंडयोग, व्यायामयोग, घोष वादन यांची प्रात्यक्षिके सादर केली. संघाच्या गणवेश धारी स्वयंसेवकाचे शहरातून निघालेले पथसंचलन व संपूर्ण कार्यक्रमात आमदार करण देवतळे संपूर्ण गणवेशात सहभागी झाले होते. आमदार आणि तेही संपूर्ण गणवेशात सहभागी होण्याची शहरातील ही पहिलीच वेळ आहे हे विशेष. नगर कार्यवाह अंकित तेलासे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. मनीष दसरिया याने अमृत वचन तर सौरभ भागडे यांनी सुभाषित सादर केले. अखिलेश द्रविड यांनी “शून्य से एक शतक बनते” हे वैयक्तिक गीत सादर केले. कार्यक्रमाला गणमान्य नागरिक व माता भगिनींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.


