गायत्री मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
चंद्रपुर : शिक्षण, आत्मनिर्भरता आणि संघटनबळ या तीन प्रमुख गोष्टी महिलांच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वाच्या आहेत, महिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये, स्त्री ही केवळ कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. तिने शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि आत्मसन्मान यांचा स्वीकार केला पाहिजे. आजची महिला घराची जबाबदारी सांभाळतानाच सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातही योगदान देत आहे.” असे प्रतिपादन पूजा पोतराजे यांनी केले त्या जागतिक महिला दिनानिमित्त गायत्री मंदिर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांच्या सशक्तीकरणावर या विषयावर त्या बोलत होत्या.
. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. माया मानकर, वेणू उईके, खुशबू बोपचे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामलता पसारे यांनी केले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित महिलांनी सामूहिकरीत्या गायत्री मंत्र पठण करून कार्यक्रमाच्या वातावरणाला भक्तिमय आणि ऊर्जावान रंग दिला.
. वेणू उईके यांनीही महिलांच्या शिक्षणावर भर देत, “स्त्रियांनी आपल्या आत्मनिर्भरतेकडे लक्ष द्यायला हवे. समाजातील अडथळ्यांवर मात करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद प्रत्येक महिलेमध्ये आहे,” असे सांगितले. खुशबू बोपचे यांनी महिलांनी एकत्र येऊन काम करण्याचे महत्त्व सांगितले. “समानतेचा विचार केवळ भाषणापुरता न ठेवता, तो कृतीत उतरवण्याची गरज आहे. महिलांनी एकी दाखवली तर समाजात मोठे बदल घडवता येतील,” असे त्या म्हणाल्या.
. कार्यक्रमाच्या शेवटी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने संपूर्ण वातावरण आनंददायी झाले. उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे कौतुक केले.
. कार्यक्रमाच्या सांगतेला महिलांसाठी विविध ठोस संकल्प करण्यात आले. स्त्री शिक्षणाला प्राधान्य देणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, स्त्री-पुरुष समानतेचा विचार समाजात रुजवणे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे यावर भर देण्यात आला. ‘जय गायत्री माता’च्या जयघोषात महिलांनी एकी आणि सशक्तीकरणाचा निर्धार केला.


