विसापूर येथे विशेष शिबीर
उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रशासनाची लगबग
बल्लारपूर : केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजनांची माहिती देत आहे. यासाठी शासन आपल्या दारात येत आहे. केंद्र सरकारने ‘अग्रिस्टक’ अर्थात फार्मर आयडी ही महत्वकांक्षी योजना सुरु केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ मिळणे, सुलभ होणार आहे. शेतकऱ्यांनी ‘अग्रिस्टक’ योजनेत सहभागी होऊन लाभान्वित व्हावे, असे प्रतिपादन बल्लारपूरचे नायब तहसीलदार सतीश साळवे यांनी विसापूर येथे केले.
. बल्लारपूर तहसील कार्यालय व तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने विसापूर ग्रामपंचायत सभागृहात शेतकऱ्यांसाठी ‘अग्रिस्टक’ योजनेच्या माध्यमातून फार्मर आयडी तयार करून घेण्यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी शिबीराचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा कुळमेथे होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, बल्लारपूर तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, मंडळ अधिकारी किशोर नवले, अन्न पुरवठा विभागाच्या प्राजक्ता सोमलवार, महसूल अधिकारी आरती दुलत, कृषी साहायक यु.एम.डिकले, ग्रामविकास अधिकारी किशोर धकाते, लिपीक संतोष निपुंगे यांची उपस्थिती होती.
. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण म्हणाले, ‘अग्रिस्टक’ योजनेत प्रत्येक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला पाहिजे. फार्मर आयडी तयार झालेल्या शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ कोणत्याही मध्यस्थी शिवाय मिळणे सोपे होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हयगय करू नये. आपला तालुका ‘अग्रिस्टक’ योजनेत शतप्रतिशत पूर्ण व्हावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, असे चव्हाण म्हणाले. प्रास्ताविक उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी केले. संचालन संतोष निपुंगे यांनी केले. आभार ग्रामविकास अधिकारी किशोर धकाते यांनी मानले. यावेळी शेतकऱ्यांची व गावकरी उपस्थित होते.


