भद्रावती : महाराष्ट्र शासनाच्या “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमांतर्गत आज विवेकानंद महाविद्यालयात वाचन पंधरवडा कार्यक्रमाचे ग्रंथदिंडी काढून उद्घाटन करण्यात आले. ग्रंथालय विभाग तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
. दिंडी सोहळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी ग्रंथ वाचनाचा संकल्प घेतला. त्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. जी.उमाटे यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथ वाचनाची शपथ दिली. ज्ञानेश्वरी, भारताचे संविधान, भगवत गीता हे महत्त्वाचे ग्रंथ पालखीत ठेवून ही ग्रंथदिंडी काढण्यात आली. घोषणा फलके, अभंग गायन याद्वारे वाचनाचे महत्त्व विद्यार्थी तसेच समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. यानंतर पुढील पंधरा दिवस ग्रंथ वाचनाचे महत्त्व विविध कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न महाविद्यालयात करण्यात येणार आहे.


