अनोख्या पद्धतीच्या राक्षस दहनासाठी उमटला जनसागर
माजरी : माजरीत दरवर्षीप्रमाणे यंदाही महागाई, भ्रष्टाचारी राक्षस दहनाचा अनोखा उत्सव वेकोलिच्या विजय स्टेडियम मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान राक्षस दहन समितीचे अध्यक्ष तथा भाजपचे माजरी शहर अध्यक्ष एम.पी. राव यांच्या पुढाकाराने गेल्या ३४ वर्षांपासून राक्षस दहनाचा कार्यक्रम सातत्याने होत आहे. दरम्यान या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली असताना दुपारी साडेतीन वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या तीन तास पूर्वी जोरदार पाऊस कोसळल्याने कार्यक्रमात लोकांच्या उपस्थितीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, सुदैवाने पाऊसाने विश्रांती घेतल्यामुळे सदर कार्यक्रम पार पडला.
. दरम्यान राक्षस दहनापूर्वी फटाक्यांची भव्य आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर या कार्यक्रमात उपस्थित भाजपचे महामंत्री नरेंद्र जिवतोडे यांच्या हस्ते विधीवत मंत्रोच्चारात राक्षस दहन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे किशोर टोंगे, आहेतेशाम अली, अंकुश आगलावे, सुधीर उपाध्या यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते जम्मू भाई (वणी ), अशरफ खान आदी उपस्थित होते. गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही आदिवासी समाजाच्या वतीने रावण दहन करण्यात येऊ नये,अशी मागणी शासनाकडे केली होती. आदिवासी समाजाने आक्रमक भूमिका घेत रावण हे आमचे दैवत असल्याचे कारण पुढे करत दसऱ्याला होणाऱ्या रावण दहणाच्या कार्यक्रमाला विरोध दर्शविला. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. दरम्यान दसऱ्याच्या कार्यक्रमाला आयोजक आणि आदिवासी समाजाचे प्रतिनिधी एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्या होत्या. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी नेमकी काय परिस्थिती निर्माण होते आणि यावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागुन होते.
. मात्र, दोन्ही पक्षाच्या संघर्ष तीव्र होताना बघून, उपविभागीय अधिकारी, वरोरा यांनी आपल्या दालनात आदिवासी समाजाचे प्रतिनिधी आणि आयोजकांची दसऱ्याच्या आदल्या दिवशी बैठक लावून कार्यक्रमादरम्यान कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावलं जावू नये याची दक्षता आयोजकांनी घ्यावी. अशी सूचना देवून कार्यक्रममाला परवानगी दिली. त्यानंतर आयोजकांकडून या कार्यक्रमाला राक्षसरुपी पुतळा दहनाचा स्वरूप देवून हा सण शांततेत आणि उत्साहात साजरा केला. कार्यक्रमादरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी माजरीचे ठाणेदार अमितकुमार पांडेय यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
दसऱ्याच्या दिवशी लाल किल्ला मैदानावर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री धार्मिक लीला कमिटी यांच्यातर्फे आयोजित रामलीला कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले. दरम्यान सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी यांनीही रामलीला कार्यक्रमात सहभाग घेतला. दरम्यान देशाच्या राजधानीत रावण दहन राष्ट्रपतीच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. हे दृश्य बघताना संपूर्ण जग याचे साक्ष ठरले. देशाची राष्ट्रपतीसुद्धा आदिवासी समाजातून आहे. राष्ट्रपतीच्या हस्ते रावण दहन झालं, याचा कोणीही विरोध केला नाही. मात्र माजरीसारख्या एका लहान गावात आदिवासी समाजाकडून विरोध होत असेल, तर हे हजारो वर्षांपासून सुरु असलेल्या परंपरेला बाधा टाकण्यासारखे आहे. दरम्यान आदिवासी संघटनेने केलेल्या विरोधावर आयोजकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


