‘जागर शिक्षणाचा’ कार्यक्रम
कोरपना : आजची स्पर्धा जागतिक झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत प्रचंड क्षमता आहे. शिक्षणातून सामाजिक जाणीवा विस्तारायला हव्या.आजच्या काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांनी आता ‘लोकल टू ग्लोबल’ झेप घेण्याची गरज आहे. असे प्रतिपादन युरोपातील एडिनबर्ग विद्यापीठात उच्च शिक्षण घेतलेले जय भारत चौधरी यांनी केले.
. जागृत संस्था व महात्मा गांधी विद्यालयाच्या वतीने सोनुर्ली येथे ‘जागर शिक्षणाचा’ हा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अध्यक्ष महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य बबन भोयर तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते व जागृत संस्थेचे संचालक अविनाश पोईनकर, प्रा. नरेश परसूटकर, दीपक चिव्हाणे, साईनाथ कुंभारे, दत्ता येडमे, विनोद पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.
. जय चौधरी यांनी एडीनबर्ग विद्यापीठातील आपला अनुभव विद्यार्थ्यांपुढे कथन केला. उच्च शिक्षणाने जागतिक दृष्टिकोन तयार होतो असे मत देखील व्यक्त केले. जागृत संस्थेचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोईनकर यांनी ‘शिक्षण कशासाठी?’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षण केवळ नोकरीसाठी नाही तर सन्मानाने जगण्यासाठी, सामाजिक बदलांसाठी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य बबन भोयर यांनीही महाविद्यालयात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांनी शिक्षणातून पुढे जावे हा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमित काकडे यांनी केले. उच्चशिक्षणाचे वातावरण विद्यार्थ्यात निर्माण व्हावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. संचालन नंदनी चामाटे, आभार जया तिखट यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.


