नागरिकांच्या सूचना व हरकती आमंत्रित
२० फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ पर्यंत चंद्रपूर पाटबंधारे विभागाकडे माहिती देण्याचे आवाहन
चंद्रपूर : इरई नदीलगतच्या चंद्रपूर शहरातील विविध प्रभागांसह परिसरातील २८ गावांमध्ये पिवळी पूररेषा आखण्याचे काम पाटबंधारे विभागामार्फत सुरू आहे. या आखणीबाबत नागरिकांना आपल्या सूचना, हरकती किंवा प्रत्यक्ष जागेसंबंधीची माहिती सादर करण्यासाठी २० फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
. चंद्रपूर पाटबंधारे विभागाने १ ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत कढोली, चिंचोली, वढोली, पायली, किटाळी, मिनगांव, चांदसुर्ला, लोहनविचोडा, अंबोरा, विचोडी बु., नेरी, पडोली, लखमापूर, वडगांव, चांदा रै. कोसरा, रहमत नगर, बालाजी वार्ड, नगिनाबाग, सिस्टर कॉलनी, जगन्नाथ बाबा नगर, चंद्रपूर शहर, दाताळा, देवाडा, बोररिठ, आरवट, चारवट, नांदगाव पोडे आणि हडस्ती या गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली होती. यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून पूरस्थितीची माहिती गोळा करण्यात आली होती.
. या माहितीच्या आधारे आता पिवळी पूररेषा निश्चित केली जात आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता राहावी आणि स्थानिक भौगोलिक परिस्थितीची अचूक नोंद व्हावी, यासाठी नागरिकांना साद घालण्यात आली आहे. ज्या नागरिकांना या आखणीबाबत काही सूचना द्यायच्या असतील किंवा आपल्या भागातील पूरस्थितीबाबत अधिकृत माहिती द्यायची असेल, त्यांनी उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग (सिंचन), सिव्हील लाईन, चंद्रपूर या कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
. “नागरिकांनी या प्रक्रियेत सहकार्य करून वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून भविष्यातील पूर नियोजनासाठी अचूक पूररेषा आखणे शक्य होईल,” असे आवाहन चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जलेश सिंह यांनी केले आहे.


