भद्रावती : सखी सावित्री समिती नंदोरी व महाराष्ट्र पोलीस संघटनेतर्फे भटाळी, पानवडाळा आणि डोंगरगाव (खडी) येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देत शालेय विद्यार्थ्यांना समुपदेशन व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सखी सावित्री समिती नंदोरी केंद्राच्या समुपदेशक अश्लेषा जीवतोडे भोयर आणि महाराष्ट्र पोलीस संघटनेच्या शिलेदार आरती डुकरे यांनी विद्यार्थ्यांना विविध बाबींचे अवलोकन केले.
. पानवडाळा आणि डोंगरगाव (खडी) येथील विद्यार्थ्यांना आजच्या काळाची गरज लक्षात घेता “चांगला स्पर्श वाईट स्पर्श” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. लहान मुलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली जागरूकता निर्माण करण्यावर भर देत अश्लेषा जीवतोडे यांनी मुलांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनीही प्रश्न विचारून त्यांचे शंका निरसन करून घेतले.
. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन क्रमांक व तक्रार पेटी याबद्दल आरती डुकरे यांनी माहिती दिली. कोणत्याही प्रकारच्या अनुचित वर्तनाविरुद्ध त्वरित आवाज उठविणे किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
फक्त मार्गदर्शनावरच न थांबता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची जाण ठेवून त्यांना शालेय साहित्यही वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
. कार्यक्रमावेळी तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, सखी सावित्री समितीचे पदाधिकारी, अंगणवाडी सेविका तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक जाणीवेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


