विसापूर : बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत विसापूर ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान च्या वतीने ‘आमचा गाव, आमचा विकास’ यावर कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत ग्रामपंचायत स्तरावर मिळणाऱ्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधी खर्च करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका,ग्रामसंघाच्या प्रतिनिधी मार्फत विसापूर ग्रामपंचायतीचा आगामी आर्थिक वर्षासाठी गाव विकास आराखडा तयार करण्यात आला.
. कार्यशाळेचे उदघाटन सरपंच वर्षा कुळमेथे यांच्या हस्ते वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी प्रशिक्षक म्हणून पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी विलास ताजने, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, हर्षला टोंगे, शशिकला जीवने, ग्रामविकास अधिकारी किशोर धकाते, अंगणवाडी पर्यवेक्षक लता ठेमस्कर यांची उपस्थिती होती.
. विलास ताजने मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘आमचा गाव, आमचा विकास’ आराखडा गावाच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शेवटच्या घटकासाठी महत्वाची भूमिका पार पाडणारा आहे. ग्रामपंचायतीचे स्वतः चे उत्पन्न, शासनाकडून विविध योजनेत प्राप्त निधी चे नियोजन करून गावाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये गावातील सर्व घटकांचा समावेश होणे क्रमप्राप्त आहे. आरोग्य, शिक्षण, पाणी,रोजगार आदी बाबत आराखडा तयार केला पाहिजे, असे प्रशिक्षक ताजने यांनी सांगितले.
. कार्यशाळेचे प्रास्ताविक उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी केले. आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी किशोर धकाते यांनी केले. कार्यशाळेला विसापूर, नांदगाव (पोडे) व हडस्ती येथील ग्रामपंचायत पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, स्वयंसहायता बचत गटांचे कार्यकर्त्यां,साधन व्यक्तीची उपस्थिती होती.


