नागरिकांत संताप; शासनाकडून आश्वासनावर बोळवण
व्यथा दुर्लक्षित शहराची भाग – 2
मारोती चाफले
गडचांदूर : गडचांदूर शहराला तालुक्याचा दर्जा मिळावा, या चार दशकाच्या मागणीला अजूनही हुलकावणीच मिळत आहे, शासनाने कोरपना व जिवती तालुक्याची निर्मिती केली मात्र गडचांदूर शहराला दुर्लक्षितच ठेवले. महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना गडचांदूर तालुका निर्माण व्हावा अशी मागणी करण्यात आली. सन 1982 पासून सुरु असणारा तालुका निर्मितीचा लढा आजतागायत सुरूच आहे, मात्र अजूनही या लढ्याला यश आले नाही. हे गडचांदूरकरांचे दुर्भाग्यच म्हणावे.
. कोरपना तालुक्यातील सर्वांत मोठे शहर म्हणजे गडचांदूर शहराची लोकसंख्या अंदाजे 65 हजारांच्या जवळपास आहे. याठिकाणी मोठी बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय, बँकांसह अनेक सोईसुविधा उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिमेंट प्रकल्पसुद्धा गावात आहे. या शहराला तालुक्याचा दर्जा मिळावा, यासाठी चार दशकांपासून संघर्ष सुरू आहे. मात्र, शासनकर्त्यांनी आजवर आश्वासनेच दिली आहे. त्यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर आहे.
. २०११ मध्ये पहिला मोर्चा नागपूर विधानभवनावर काढण्यात आला. त्यानंतर सतत मोर्चे, बेमुदत उपोषण, हस्ताक्षर मोहीम, जनजागृती अशा अनेक प्रकारची आंदोलने करण्यात आली. परिसरातील ५२ गावांतील सर्वपक्षीय नेते मंडळी व नागरिकांना सोबत घेऊन गेल्या दहा वर्षापासून ही मागणी रेटून धरण्यात आली. मात्र, त्यावर शासनस्तरावर काहीच कारवाई करण्यात आली नाही.
शहरात विभागीय कार्यालयाचे अस्तित्व शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभागीय अभियंता वीजवितरण कंपनी, पाटबंधारे विभागाची विभागीय कार्यालये गडचांदूर शहरात अस्तित्वात आहेत. त्यासोबतच महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, शरद पवार कला महाविद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, लाल बहादूर शास्त्री विद्यालय, शरदचंद्र पवार कनिष्ठ महाविद्यालय, अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा, अस्तित्वात आहेत.
राजकीय उदासीनता ठरली मारक तालुक्याचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या गडचांदूर शहराला दुर्लक्षित ठेवण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीच जबाबदार असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. मागील 25 वर्षांपासून कोरपना तालुका राजुरा विधानसभेचं नेतृत्व करीत आहे. गडचांदूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या बीबी गावचे माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांनी पंधरा वर्ष राजुरा विधानसभेचे प्रतिनिधित्व केले मात्र गडचांदूर शहर विकासापासून कोसो दूरच राहिले, आता राजुरा विधानसभेचे प्रतिनिधींत्व करणारे आमदार सुभाष धोटे यांचा जन्म गाव खिर्डी देखील गडचांदूर शहरापासून अवघ्या तीन किमी. अंतरावर आहे. आ. सुभाष धोटेंनी पहिल्या टर्म मध्ये शहराला नागरपरिषदचा दर्जा प्राप्त करून दिला मात्र, दुसऱ्या टर्म मध्ये तरी गडचांदूर शहराला तालुक्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत होतील का ? अशी अपेक्षा नागरिक करीत आहे.