घोडाझरीच्या गडबोरी वितरीकेला टेलवरील गावांना अपुरा पाणीपुरवठा

43

२० ऑक्टोंबर रोजी शेतकरी आपल्या कुटुंबसह कार्यालयाला घेराव घालणार 

सिंदेवाही येथे छ.शिवाजी चौकात रास्तारोको करणार.

सिंदेवाही

.         घोडाझरी या लघु प्रकल्पाची ३५ ते ४० किलोमीटर लांबीची एक वितरिका सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी पर्यंत काढण्यात आली आहे. ही वितरिका इतर वितरिकेपेक्षा दुपटीने लांब आहे. तरीही पूर्वी गडबोरी वीतरिकेला शेवटपर्यंत पाणी पोहोचून शेतीला मुबलक पाणी मिळायचे.मात्र आता घोडाझरी प्रकल्प १०० टक्के भरूनही या वितरिकेला कसेबसे पंधरा दिवसातून एक दोन वेळा अपुऱ्या अवस्थेत पाणी पोहचत असल्याने या परिसरातील धानाचे पीक करपायला लागले आहे. तोंडात आलेला आहार जायची वेळ आली असल्याने सात गावातील करार धारक शेतकरी आपल्या कुटुंबासह शुक्रवार ला घोडाझरी प्रकल्पाच्या सिंदेवाही कार्यालयाला घेराव घालणार असून दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक सिंदेवाही येथे रस्तारोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन उपविभागीय अभियंता घोडाझरी पाटबंधारे विभाग कार्यालय सिंदेवाही येथे देण्यात आले.

.         मौजा गडबोरी पासुन ते घोडाझरी धरणा पर्यंतच्या नहरा लगत मोठ्या प्रमाणात शासकीय वनजमिनीवर अतिक्रमण झालेले आहेत. या अतिक्रमण धारकांचे घोडाझरी विभागातील कर्मचाऱ्यांशी चिरीमिरीचे अतूट संबंध असल्याचे नेहमीच ऐकायला मिळते. म्हणूनच करारधारक उपाशी, अन अतिक्रमण धारक तूपाशी” अशी अवस्था झाली आहे. गडबोरी वितरीकेच्या शेवट पर्यंतच्या शेतीला मुबलक पाणी न मिळण्यास गडबोरी वितरीकेच्या दोन्ही बाजुला वाढलेले अतिक्रमण कारणीभूत आहे. हिच खरी वास्तविकता आहे. हजारो हेक्टर जमीन धान पिकाची असल्यामुळे शेतीला मुबलक पाणी मिळणे आवश्यक आहे. तलाव तुडुंब भरलेले असतानाही यावर्षी फक्त दोन-चार दिवस शेतीला पाणी मिळाले तर शेवटपर्यंत लांबलेले पाणी अचानक बंद होते. त्यामुळे अंतिम टोकावरील शेतकरी द्विधा मनस्थितीत असून शेतकऱ्यात लोकप्रतिनिधी व प्रशासना विरुद्ध असंतोष निर्माण झालेला आहे. योग्यवेळेस शेतातील धान पिकाला पाणी न मिळाल्यास हजारो हेक्टर मधील धानपिक करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी शेतकऱ्यापुढे आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे घोडाझरी प्रकल्पाच्या गडबोरी वितरिकेच्या शेवटच्या टोकावरील गावांना शेतीकरिता अखंडित पाणीपुरवठा न झाल्यास वानेरी, रामाळा, गडबोरी, मिनघरी, नाचनभट्टी, उमरवाही व अंतरगाव इत्यादी गावातील संपूर्ण करारधारक शेतकरी आपल्या कुटुंबासह उपविभाग अभियंता घोडाझरी पाटबंधारे विभाग सिंदेवाही या कार्यालयाला २०/१०/२०२३ रोजी शुक्रवारला घेराव घालून दुपारी १:०० वाजता शिवाजी चौक सिंन्देवाही येथे “रास्ता रोको आंदोलन” करणार आहेत घोडाझरी धरणाचे बंद केलेले पाणी गडबोरी वितरीके च्या टेलवरील गावांना अखंडित पाणी पुरवठा करण्यात यावे.

.         आंदोलकांच्या गडबोरीच्या टेलवरील गावांना अखंडित पाणी पुरवठा सुरु ठेवणे, अतिक्रमण धारकाशी साटेलोट्याचे सबंध प्रस्तापित करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करणे,मुख्य वितरीकेच्या उपनलिकेला लावलेले अवैध सिमेंट पाईप काढणे, मुख्य वितरीका व उपनलिकेचे नादुरुस् गेट दुरुस्त करणे, नवरगाव ते वानेरी मुख्य वितरीकेतील गाळ उपसा करणे यासारख्या प्रमुख मागण्या करीत याबाबतचे निवेदन खासदार अशोक नेते, तहसीलदार तहसील कार्यालय सिंदेवाही, उपविभागीय अभियंता घोडाझरी पाटबंधारे विभाग सिंदेवाही यांना देण्यात आले आहे. गडबोरीसह परिसरातील सत गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असाताना लोकप्रतिनिधी, आणि प्रशासन मूंग गिळून गप्प का बसले आहेत. असे विचारत या भागात सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी मुरलीधर काशिनाथ मडावी केशव भाऊराव नागोसे रमपाल धाडूजी गरमडे, अजय प्रेमदास गुरु, गजाजन दादाजी कुन्नावार, मारोती नागोराव पात्रे योगेश बळीराम खडसिंगे या शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.