१५ सप्टेंबर पासून धावणार बल्लारपूर मार्गे वंदे भारत एक्सप्रेस !

15

नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान राहणार पाच थांबे 

१६ डब्याची असणार अती जलद रेल्वे गाडी

विसापूर : मध्य व दक्षिण भारताला जोडणारी अती जलद रेल्वे सेवा प्रवाशांच्या सेवेत येत्या १५ सप्टेंबर पासून रूजू होत आहे. १30 प्रती किलोमीटर तासाने धावणारी वंदे भारत एक्सप्रेस १६ डब्याची असणार आहे. नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पाच शहरात थांबे देण्यात आले असून चंद्रपूर जिल्हा यासाठी भाग्यशाली ठरला आहे. चंद्रपूर व बल्लारपूर येथील रेल्वे स्थानकावरून प्रवाशांना सुविधा मिळणार आहे.नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस बल्लारपूर मार्गे येत्या १५ सप्टेंबर पासून धावणार असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

.       चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्रव्यवहार करून मध्य भारत व दक्षिण भारताला जोडणारी वंदे भारत रेल्वे सेवा देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल रेल्वे मंत्रालयाने घेतली. दक्षिण मध्य रेल्वे विभागाने वंदे भारत एक्सप्रेसला मान्यता दिली. रेल्वे प्रशासन येत्या १५ सप्टेंबर पासून  नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला सुरू करणार असल्याची माहिती, रेल्वे प्रशासनाच्या सुत्राने दिली.

.       नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी जानेवारी २०२3 ला घेण्यात आली होती. त्यानंतर दररोज धावण्यास मुहूर्त ठरविण्यात आले आहे.ही अती जलद अत्याधुनिक व आरामदायक वंदे भारत नागपूर येथून सुटल्यावर सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारपूर, रामगुडंम, काजीपेठ येथील प्रवाशांना घेऊन सिकंदराबाद येथे पोहचणार आहे. या रेल्वे मार्गातील अंतर ५७८ किलोमीटर इतके आहे. या रेल्वे मुळे पर्यटकांना, व्यापार्यांना, विद्यार्थ्यांना, उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे,असा विश्वास नमो रेल्वे वेलफेयर पॅसेंजर असोसिएशनचे अध्यक्ष अजय दुबे यांनी व्यक्त केला आहे.

असे आहे नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत रेल्वेचे वेळापत्रक : नागपूर ते सिकंदराबाद ही वंदे भारत एक्सप्रेस दररोज धावणार आहे. ही अती जलद रेल्वे गाडी नागपूर येथून सकाळी ५ वाजता सुटणार आहे. दरम्यानच्या पाच रेल्वे थांब्यावर प्रत्येकी दोन मिनिट थांबून पुढे मार्गस्थ होणार आहे. सेवाग्राम येथून ५.५0 वाजता, चंद्रपूर येथून ७.२0 वाजता, बल्लारपूर येथून ७.४0 वाजता, रामगुडंम येथून ९.१0 वाजता, काजीपेठ येथून १0.0६ वाजता सुटणार असून सिकंदराबाद येथे १२.१५ पोहचणार आहे. सिकंदराबाद येथून परतीचा प्रवास रात्री १ वाजता सुरू होत, ही रेल्वे नागपूर रेल्वे स्थानकावर सकाळी ८.२0 वाजता येणार आहे.