बुद्ध-बाबासाहेबांच्या समताधिष्ठित प्रबोधनासाठी वामनदादा सारख्या कलावंताची गरज – अहेतेशाम अली

28

वरोरा : महाकवी, लोकशाहीर वामनदादा कर्डक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लिखाणातून महाराष्ट्राच्या घराघरात, खेड्यापाड्यात, वाड्या तांड्यात पोहोचवण्याचे काम केले. बुद्ध -फुले -आंबेडकर यांचा विचार हा वामनदादाचा श्वास होता, ऊर्जा केंद्र होते हे विचार प्रभावीपणे प्रसारित करत वामनदादा जीवनाच्या शेवटपर्यंत फिरत राहिले त्यामुळे समाज जागृती होत राहिली. मात्र वामनदादा नंतर समतावादी विचार तेवढ्याच ताकदीने, निस्वार्थपणे पोहचविण्यास कलावंतांचे प्रयत्न कमी पडले. म्हणूनच आजच्या काळात बुद्ध -फुले -आंबेडकर विचाराच्या प्रसाराकरिता महाकवी वामनदादा सारख्या कलावंताची गरज असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली वरोरा यांनी दि. २५ मे रोजी वामनदादा कर्डक विचार मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी केले.

.        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुशिला भगत, सामाजिक कार्यकर्त्या आलापल्ली ह्या होत्या तर उद्घाटक म्हणुन माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली वरोरा, प्रमुख अतिथी कायदे विषयी अभ्यासक विनोद खोब्रागडे वरोरा, ज्येष्ठ कवीयत्री शोभाताई वेले नागपूर, जिल्हाध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ राजेश सोलपण चंद्रपूर, शिवसेना जिल्हाध्यक्ष मुकेश जीवतोडे चंद्रपूर इत्यादी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

.        प्रथम सत्रात स्नेहल शिरसाट हिने आपल्या सुमधुर आवाजात स्वागत गीत सादर केले. त्यानंतर विनोद खोब्रागडे कायदे अभ्यासक वरोरा यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. दुसऱ्या सत्रामध्ये बुद्ध-भीम गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये ३६ स्पर्धकांनी भाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सोहम कुमरे, दुतीय क्रमांक देविका भोयर, तृतीय क्रमांक अश्विनी पाटील यांनी पटकावला गीत गायन स्पर्धेचे सूत्रसंचालन हेमंत शेंडे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक यांनी केले.
तर तिसऱ्या सत्रामध्ये निमंत्रितांचे कवी संमेलन घेण्यात आले.

.        या कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. ईसादास भडके महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक व ज्येष्ठ कवी चंद्रपूर हे होते तर विशेष अतिथी शोभाताई वेले कवयित्री नागपूर, ॲड. योगिता रायपूरे चंद्रपूर ह्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे धारदार सूत्रसंचालन नरेंद्र सोनारकर, विद्रोही कवी बल्लारपूर यांनी केले आणि शेवटच्या पर्वामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा सत्कार करण्यात आला. यामध्ये दशरथ शेंडे, चेतन शर्मा, किरण साळवी, वंदना मून अशोक गुरुवाले यांचा सत्कार करण्यात आला.

.        सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुनील शिरसाट, अमर गोंडाणे, हितेश राजनहिरे, सागर ढोके, पुष्पा साठे, उषा मुन, मेघा भालेराव, योगेश खोब्रागडे, माया सखदेवे यांनी अथक परिश्रम घेतले. उद्घाटकीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमर गोंडाने यांनी केले तर सूत्रसंचालन विजय भसारकर व आभार रंगशाम मोडक यांनी व्यक्त केले.