भद्रावती तालुक्यातील बरांज मोकासा येथील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करा

35

        अन्यथा कंपनीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करणार       

भद्रावती

.           बरांज मोकासा येथील गावाचे पुनर्वसन प्रकल्पग्रस्त शेतकरी व गावातील नागरिकांसह कामगाराच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा बरांज येथील महिलांनी १४ डिसेंबर पासून घेतला असुन आंदोलनाची प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारची दखल घेतल्या गेली नाही असा आंदोलनकारी महिलांनी आरोप करीत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

.           याबाबतची तक्रार महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभाध्यक्ष विलास नेरकर यांना दिली असता नेरकर यांनी भद्रवती चे तहसीलदार यांचेशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासकिय हालचालींना वेग आला. तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांचेशी चर्चा करण्यासाठी प्रकल्पग्रस्त महिलांना चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे बोलावले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोणत्याही स्वरूपाचा ठोस निर्णय न देता उपाययोजने बाबत देखील चर्चा न झाल्याने प्रकल्पग्रस्त महिलांनी आमरण उपोषण सुरू ठेवलेले आहेत.

.           महिलांच्या आंदोलनाचा आजचा २८ वा दिवस सुरू असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांना माहिती देण्यात आली तेव्हा लगेच आंदोलन करण्याऱ्या महिलांच्या मंडपाला भेट देउन मागण्यांबद्दल जाणून घेतले. यावेळी वरोरा-भद्रावती विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, तालुकाध्यक्ष राजू बोरकर, शहराध्यक्ष गीतेश सातपुते, तिमोटी बंडावार, रोशन फुलझेले, गणेश बावणे यांचेसह इतर कार्यकर्त उपस्थित होते.

.           आंदोलन कर्त्यां महिलांनी बरांज गावात जाऊन बघा असे सांगितल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी गावाची पाहणी केली असता पहिली ते सातवी पर्यंतच्या जिल्हापरिषद शाळेत जाऊन बघितले असता अक्षरशः शाळेला लागूनच १५ फुटावर कोलमईन्सचा खोल दरी दिसून आली. उत्खनन केलेल्या खदानीला कंपनीतर्फे कोणत्याही पद्धतिने संरक्षित केलेले नसल्याने जीवित हानी देखील होऊ शकते. पुनर्वसन्नाच्या च्या संबंधाने सुरुवातीला करण्यात आलेल्या करारातील प्रमुख मुद्यांना कंपनीतर्फे केराची टोपली दाखविण्यात आली. अनेकांना जमीनींचा, घराचा मोबदला अजूनही मिळाला नसल्याने काही कुटुंब तेथेच राहत आहे. कंपनीतर्फे होणार्या ब्लास्टिंग मुळे बऱ्याच घरांना भेगा पडलेल्या आहे.

.           रोजगारा संबंधाने केलेले करार सुद्धा कंपनीने पाळले नसल्याने गावात बेरोजगारांची संख्या देखील मोठी असल्याचे आंदोलनकारी महिलांनी निदर्शनास आणून दिले. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांना पाठिंबा जाहीर करीत आपल्यावर झालेला अन्याय तथा आंदोलनाच्या संबंधातील रास्त मागण्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडून यांच्या माध्यमातुन सोडविण्याचा पुरेपुर प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाध्यक्ष नितिन भटारकर यांनी आंदोलक महिला तथा गाववासियांना दिले.